रक्तातील बिघाड झाल्यामुळे होणार्‍या सांधेदुखीच्या प्रकारांपैकी एक वैशिष्टयपूर्ण प्रकार म्हणजे गाऊटचा संधिवात. या विकाराची कारणे कोणती यावर आयुर्वेदिक उपचार कसे केले जातात

गाऊट म्हणजे नक्की काय? 

विविध कारणांनी ज्यावेळी रक्तातील प्युराईनच्या चयापचय क्रियेत बिघाड होऊन रक्तातील युरिक अ‍ॅसिड या घटकाचे प्रमाण 6 मि.ग्रॅ. पेक्षा जास्त होते आणि परिणामी तयार होणारे विविध क्षार सांध्याच्या आतील भागावर व स्नायूंमध्ये साठू लागतात आणि सांधे सुजून सांधे दुखू लागतात त्या संधिवाताच्या प्रकाराला, ‘गाऊटचा संधिवात’ असे म्हटले जाते.गाऊची कारणे कोणती : रक्तात तयार होणारे युरिक अ‍ॅसिड, रोज ठराविक प्रमाणात शरीरातून लघवीवाटे उत्सर्जीत होत असते. ज्यावेळी हे उत्सर्जन व्यवस्थित होत नाही, अशावेळी त्याचे रक्तातील प्रमाण वाढेल. उदा. स्थूलपणा, वाढलेले वजन, उच्च रक्तदाब, रक्तातील चरबीचे प्रमाण जादा असणे, लघवीला साफ होत नसणे, किडनीचे विकार, अतिमद्यपान, काही रासायनिक औषधांचे दुष्परिणाम, अतिप्रवास, पाणी कमी पिणे, इ. कारणांमुळे युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन पुरेसे होत नाही व त्याचे रक्तातील प्रमाण वाढू शकते.

काहीवेळा रक्तात युरिक अ‍ॅसिडची प्रमाणापेक्षा जास्त उत्पत्ती होते व त्याचे प्रमाण वाढल्याचे आढळते. हिमोलायटिक अ‍ॅनिमिया, सोरीयासिस या विकारांमुळे होणारे रक्तातील बिघाड, चयापचय क्रियेतील दोष, काहीवेळा हार्मोन्समधील असंतुलन यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढून गाऊटचा संधिवात होऊ शकतो. आयुर्वेदाने वर्णन केलेल्या ‘वातरक्त’ या विकाराशी गाऊट या विकाराचे साम्य आढळून येते. 

अतितिखट, आंबट, तळलेले, मसालेदार, अतिमद्यपान करणार्‍या व्यक्तींनी अतिप्रवास, अतिव्यायाम, धावपळ, कष्टाची कामे जास्त केल्यास या विकाराची अत्पत्ती होते अशी कारणीमांसा आयुर्वेदाने सांगितली आहे.

गाऊटमुळे कोणत्या तक्रारी होतात ? 

रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त वाढलेले असताना अतिव्यायाम,अतिप्रवास, कोणताही अपघात होणे, शस्त्रक्रिया, वजन कमी होणे, अतिमद्यपान, अतिमांसाहार यापैकी कोणतेही कारण घडल्यावर सांध्यांच्या विविध तक्रारी सुरू होतात. पायाच्या अंगठे सांधा याठिकाणी सूज येते. तीव्र वेदना होऊ लागतात. कालांतराने पायाचा घोटा, गुडघे, कोपर, मनगट, या सांध्यामध्ये देखील आजार पसरू शकतो. तीव्र वेदना रात्रीच्यावेळी अधिकच वाढत असतात. सांधा सुजलेला लालसर व गरम असतो. कालांतराने ही सूज कमी होते. काहीवेळा त्यावरील त्वचेची साले जातात. काही रूग्णात बारीक ताप, भूक न लागणे, निरूत्साह अंगदुखी अशा तक्रारीही जाणवत असतात.

गाऊटचे दुष्परिणाम  

गाऊटच्या विकारात याच जोडीला मूतखडा होणे, किडनीचे काम कमी होणे, स्थूलपणा, वजन वाढणे, रक्तदाब जास्त राहणे अशा तक्रारी होऊ शकतात.

गाऊटच्या संधीवातावरील उपचार 

गाऊटच्या संधिवाताचे निदान झाल्यावर अनेकजणांना सुरूवातीला वेदनाशामक औषधे दिली जातात. याच बरोबर रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन वाढविणारी अशी रासायनिक औषधे दिली जातात. याने अनेकांना आरामही पडतो, पण पथ्य नीट न सांभाळल्यास औषधांची सवय लागलेली असते तर काहींना साईड इफेक्ट होत असतात.

गाऊटवरील आयुर्वेदीय उपचार  

गाऊटच्या संधिवातावर उपचार करताना रूग्णाचे वय, वजन, प्रकृती, आहाराचे स्वरूप, प्रवासाचे प्रमाण, व्यसने, पूर्वी झालेले उपचार, शरीरातील इतर विकार, सुरू असणारी इतर रासायनिक औषधे, ताणतणाव यांचीच सखोल माहिती घेऊन दोषाचे अधिक्यानुसार प्रकार निश्‍चिती करून सांघिक उपचार सुरू केले जातात. पंचकर्म, औषधी उपचार आणि पथ्य मार्गदर्शन असे त्यांचे स्वरूप असते.

औषधी उपचार  

दोषाधिक्याचा विचार करून गुडूची, चंदन, निरगुंडी, शतावरी, त्रिफळा, रास्ना, एरंड, कोकीलांक्ष, सारीवा, मंजिष्ठा, निग्ब, कांचनार, वरूण, गोखरू, दशमुळ, गुगुळमुळे इ. पासून तयार झालेली संयुक्त औषधे वापरली जातात. त्रास जास्त असताना भौक्तिक, चांद्रपुटी प्रवाळ, गुळवेल सत्व यांचाही वापर केला जातो.

गाऊटमधील टाळण्याचा आहार : गाऊटच्या विकाराबाबत त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून पथ्य पालनाला जास्तच महत्त्व आहे. दही, लोणचे, अतितिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ, तळलेले विदाही पदार्थ, आंबवलेले पदार्थ, मांसाहार, अंडी, मद्यपान, उन्हात काम, जागरण, जास्त उभे राहणे, अतिप्रवास, अतिव्यायाम सदैव टाळणे महत्त्वाचे असते.

मोरावळा, कोकम सरबत, लिंबू सरबत, दूध, तूप, गुलकंद, द्राक्षे, डाळिंब, धान्याचे पाणी या गोष्टी नियमित आहारात ठेवाव्यात. थोडक्यात गाऊटच्या विकारावर आयुर्वेदीय उपचारांनी आणि पथ्य पालनाने उत्तम नियंत्रण ठेवता येते.

Previous Post Next Post